गुरुकुंज आश्रम

Gurukunj    02-May-2022
Total Views |



mandirnew
'गुरुदेव सेवा मंडळे', स्थापोनिया सुखवी सदा । सांगे बहुता 'कार्य है, करण्यास या रे !" सर्वदा ॥ नच स्थीर राहे एकसा, फिरतो स्वकार्या क्षणक्षणा ॥ घे ईश्वरी आदेश हा, करि सामुदायिक प्रार्थना ॥ - वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

विश्व स्नेह का ध्यान धरे। सबका सब सम्मान करे - तुकड्यादास

या विश्वात्मक भावनेचा अंकुर प्रत्येकाच्या हृदयात निर्माण करणारे आधुनिक तीर्थक्षेत्र म्हणजे श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम होय. अखिल विश्व हे स्नेहाच्या धाग्यात गुंफणे हे धर्माचे काम आहे. हे काम या गुरुकुंजांत अव्याहतपणे सुरू असते. जगात प्रत्येक धर्माचार्याने आपापल्या धर्माचे तीर्थस्थान निर्माण केले आहे. परंतु या गुरुकुंजांत सर्वच धर्मांना सारखेच स्थान दिले आहे. 'सबके लिये खुला है, मंदिर यह हमारा । मतभेद को भूला है मंदिर यह हमारा' हे याचे ब्रीद आहे. आणि 'आओ कोईभी पंथी, आओ कोईभी धर्मी' हे इथले स्वागत गीत आहे. अन् 'सबका भला हो जगमें यही कामना हमारी' हेच इथल्या सेवकाचे ध्येय आहे. या गुरुकुंजांत कोणालाच मज्जाव नाही, सर्वपंथांचे अन् सर्वधर्माचे हे तीर्थक्षेत्र आहे. सर्व धर्माचे प्रतिक म्हणजे श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम. सर्वांना सारखाच मान, सर्वांच्या देवतांना, साधुसंतांना इथे सारखेच स्थान. सर्वांचेच दर्शन इथल्या प्रार्थना मंदिरात प्रवेश करताच होते आणि मनात विश्वात्मक भाव जागृत होतो. हे गुरुकुंज कर्म-ज्ञान - भक्तिचे माहेर आहे. हे विश्वमानवांना समाविष्ट करुन घेणारे तिर्थक्षेत्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या युगपुरुषाने निर्माण केले आणि जनता जनार्दनाला समर्पण केले. या स्फूर्तिस्थानाचा आगळावेगळा इतिहास आहे.

श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम अमरावती-नागपूर महामहामार्गावर आहे. यावली येथे जन्मलेल्या महाराजांनी कर्मभूमी म्हणून दीड हजार लोकसंख्येच्या मोझरीजवळील निवड केली. विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी महाराजांची भटकंती सुरू असायची. त्यामुळे कुठेही सहज जाता यावे म्हणून महाराज गुरुकुंजमध्ये स्थिरावले. १९३५ मध्ये रामराव देशमुखांच्या माध्यमातून गावात आले. गावाच्या कायापालटाचा प्रवास सुरू झाला. महाराजांनी गवताची कुटी उभारून परिवर्तनास सुरुवात केली. भजन व रूग्णसेवा सुरू झाली. कार्य झपाट्याने सुरू असले तरी गावची लोकसंख्या कमी असल्याने ग्रामपंचायत नव्हती. त्यामुळे महाराजांनी एक ते दीड हजार लोकवस्तीचे गुरुदेवनगर निर्माण करण्याचा निर्णय घेतला. महाराजांच्या कार्याने प्रभावित तत्कालीन मंत्री बाळासाहेब देसाई व आबासाहेब खेडकर यांनी विशेष बाब म्हणून गावास ग्रामपंचायतचा दर्जा दिला. राज्यातील हा पहिला निर्णय होता. महाराज मोझरीला आदर्श ग्राम करण्यासाठी कार्यरत झाले. कुटीतून आश्रम, रुग्णालय असा प्रवास सुरू झाला. मोझरीने कात टाकण्यास सुरूवात केली. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी, तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, तत्कालीन देशपातळीवरील राजकीय नेते, सामाजिक संघटनांचे दिग्गज मोझरीत येऊ लागले. महाराजांच्या प्रभावी कार्याने प्रत्येकाला गुरुकुंज मोझरी ऊर्जास्त्रोत वाटू लागले. पंतप्रधान, राष्ट्रपती, विदेशी पाहुणे, संत महात्मे यांची रेलचेल वाढत गेली. सामूहिक प्रार्थनेला हजारोंचा जनसमुदाय एकत्र येऊ लागला. आज मोझरीत फेरफटका मारला तर जाणवते की, महाराजांना जाऊन ५० वर्षांहून अधिक काळ लोटला तरी देखील महाराजांचे विचार जिवंत आहेत.

महाराजांनी निर्माण केलेल्या आश्रमासमोर त्यांचे समाधीस्थळ आहे. आश्रमातील प्रार्थना रिक्त गादीसमोर होते. प्रत्येकाने त्यांचे इष्ट देवता, आराध्य यात पहावे असे महाराज म्हणायचे. याच गादीवरील निळा दिवा हा थेट समाधीवरील निळा दिव्याला समांतर आहे. समाधीस्थळातून आपणास आपल्या गुरुदेवांचे दर्शन घेता यावे, हा महाराजांचा संकल्प अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाने पूर्ण केला आहे. म्हणूनच समाधीस्थळावरून प्रार्थना मंदिरातील गादी नजरेस पडते. याठिकाणी सर्वधर्मीय धर्मप्रवर्तकांचे छायाचित्र आहे. महाराजांचे आसनदेखील गादीशेजारी ठेवण्यात आले आहे.

अस्थिकुंडात विसर्जन

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अस्थिविसर्जनाबद्दल क्रांतिकारी विचार व्यक्त करायचे. अस्थिविसर्जनासाठी काशीला अथवा नदीच्या ठिकाणी का जायचे असा प्रश्न विचाराचे. यासाठी पर्याय म्हणून त्यांनी आश्रमात अस्थिकुंड तयार केले. या कुंडामध्ये देशभरातील एकुण ३४ नद्यांचे जल त्यांनी सोडले. यानंतर तत्कालीन राष्ट्रपती इंदिरा गांधी, राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, जयप्रकाश नारायण व अनेकांच्या अस्थींचे याच ठिकाणी विसर्जन झाले. आजही दररोजच्या प्रार्थनेनंतर अनेकजण त्यांच्या नातेवाइंकांच्या अस्थींचे विर्सजन याच अस्थिकुंडात करतात.

दास टेकडीवरचा एकांतवास

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी त्यांच्या शेवटच्या काळात दासटेकडीवर मुक्काम सुरू केला होता. एकातांसाठी गावापासूनच जवळ असलेल्या दास टेकडीवर त्यांनी एक मंदिर उभारले होते. पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांचा त्रास वाचावा यासाठी त्यांनी याठिकाणी येण्याचे आवाहन केले होते. याकरिता त्यांनी रामकृष्णहरी मंदिर उभारले. दास टेकडीवर जागतिक दर्जाचे ग्रंथालय उभारण्याचा त्यांचा मानस होता. दास टेकडीदेखील महाराजांच्या ऊर्जेने ओतप्रोत असल्याचे जाणवते. टेकडीवरील वातावरणदेखील आश्रमाइतकेच पावित्र्यमय असल्याची साक्ष पटते.